माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत सोमवारी (ता. ३०) संपली, मात्र तलाठ्यांच्या संपामुळे दाखले न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता आले नाहीत. शिष्यवृत्ती मिळण्यापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत, यासाठी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा, युवा मोर्चा आणि बेरोजगार मोर्चामार्फत करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
राज्यात सुरू असलेल्या तलाठ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळालेले नाहीत. परिणामी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता आले नाहीत. माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी किमान सहा हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळते. यापासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या १७ वसतिगृहांपैकी १५ वस्तिगृहांचे अनुदान सरकारने बंद केले आहे. हे अनुदान पूर्ववत सुरू करावे, असा आग्रह भारतीय विद्यार्थी मोर्चाने धरला आहे. शिक्षकांसाठी सीईटी, टीईटीनंतर आता पुन्हा पात्रता परीक्षा घेण्याचे सरकारने जाहीर केले आहे, या धोरणाला विद्यार्थी मोर्चाने विरोध दर्शवला आहे. लवकरच याबाबतचे निवेदन राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि समाजकल्याण अधिकाऱ्यांना दिले जाणार अहे, अशी माहिती भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निखिल कांबळे, किशोर मानकापुरे, नामदेव गुरव, हेमंत कांबळे, मयूर कांबळे, रोहित भोगले, आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट