प्रकाश कारंडे, कागल
बहीण-भावाच्या अतूट नात्याच्या कथा आपण खूप ऐकत असतो. हे नाते घट्ट करणारी आणखी एक घटना या दिवाळीच्या अगदी काही दिवस आधीच घडली. दोन्ही किडनी निकामी झालेल्या बहिणीला किडनी देऊन त्याने भाऊबीजेला आयुष्याची ओवाळणीच दिली. भडगाव (ता. कागल) येथील विक्रमसिंह पांडुरंग पाटील हे बहिणीसाठी देवदूतच म्हणूनच पुढे आले आणि अवयवदानाच्या चळवळीला कृतीतून पाठबळ देत बहीण-भावाच्या नात्याची वीण अधिकच घट्ट केली.
विक्रमसिंह यांच्या बहीण वैशाली आनंदा पाटील यांचा सरवडे (ता. राधानगरी) येथील आनंदा पाटील यांच्याशी विवाह झाला. वैशाली यांना मुलगा आणि मुलगी आहे. आनंदा यांना मुंबईतील खासगी दवाखान्यात पर्चेस मॅनेजर आहेत. दीड वर्षांपूर्वी वैशाली यांच्या प्रकृतीत सतत बिघाड होत गेल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या दोन्ही किडनी ५० टक्के निकामी झाल्याचे निदान झाले. आठवड्यातून तीन वेळा याप्रमाणे वर्षभर वैशाली यांना डायलेसिसवर रहावे लागले. गेल्या पाच महिन्यांपासून तर त्यांना दिवसाआड डायलेसिस करावे लागत असे. त्यातच वैशाली यांच्या जिविताला धोका वाढला. अशा कठीण परिस्थितीत भडगावच्या या पाटील कुटुंबीयांनी आपल्याच कुटुंबातील किडनी देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला वैशाली यांची आई हिराबाई (वय-६२) व वडील पांडुरंग (वय-६७) यांच्या चाचण्या घेण्यात आल्या, परंतु त्यातील काही चाचण्या निगेटिव्ह आल्या.
त्यामुळे तीन बहिणीत एकटाच आणि कुटुंबातही एकच कर्ता असलेल्या विक्रमसिंह यांनी किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पत्नी वर्षा यांची साथही मोलाची ठरली. त्यामुळेच विक्रमसिंह यांचा निर्धार पक्का झाला. सर्व चाचण्या व प्रश्नांच्या अनेक फेरीनंतर डॉक्टरांनी किडनीरोपण करण्यास अनुकूलता दर्शवली. विशेष म्हणजे बहीणभावाचा रक्तगट एकच आला आणि तीन आठवड्यांपूर्वीच मुंबईत किडनीरोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे वैशालीचा जीव वाचला. आता त्या सुखरुप आहेत. शिवाय किडनीदान करणाऱ्या विक्रमसिंह यांना फराळे कारखान्यातील फिल्डमनची नोकरी, घरची शेती आणि घरातील सर्वच कामे विनाअडचण व्यवस्थित करता येतील, असा विश्वास डॉक्टरांनी दिला. एका भावाने आपल्या बहिणीच्या जीवनात किडनी दान करुन आपले कर्तव्य कृतीतून बजावले आणि बहिणीचे आयुष्य वाढविले.
०००००००००००
बहिणीसाठी किडनी दान करताना किडनी निकामी झालेल्यांना भेटून प्रथम माहिती घेतली. माझ्या किडनीमुळे बहिणीचा जीव वाचला. यासारखे दुसरे समाधान नाही. किमान आपल्या रक्ताच्या नात्यात तरी कठीण प्रसंगात प्रत्येकाने पुढे आले पाहिजे.
विक्रमसिंह पाटील, भडगाव
००००००००००
आजच्या युगात मायेचा ओलावा कृत्रिम झाला असताना माझ्या भावाने किडनी देवून दिलेले जीवदानाचे ऋण कधीच फिटणार नाहीत. मला भाऊबीजेची मिळालेली ही ओवाळणीच आहे. भावाच्या रुपाने मला देवदूतच भेटला.
वैशाली पाटील
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट